मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या धमकी नाट्यामागे नक्षलवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून शिंदे म्हणाले, या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. धमकीचे मला काही अप्रूप नाही. कोणाला वाटलं तरी ते काहीही करू शकत नाहीत. त्यांनी अशाप्रकारचं धाडस करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
या धमकीबाबत पोलीस आणि गृह विभागाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
नक्षलवाद्यांकडून याआधीही धमक्यांचे फोन आले होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दसरा मेळावा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुख्यमंत्र्यांना मिळालेली धमकी पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे.
स्फोट घडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. यानुसार पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या धमकीनंतर शिंदेंच्या ठाण्यातील आणि शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ वरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात महिनाभराआधी धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर धमकीचा फोनदेखील आला होता. पंढरपुरातील आषाढी वारीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आत्ता पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली.