Breaking News

अरविंद सावंत म्हणाले, आम्ही आयोगाला ही तीन नावे आणि चिन्हे पाठविली निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लक्ष्य

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब करत अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाला शिवसेना नावासह धनुष्यबाण वापरण्यास मनाई केली. तसेच या निवडणूकीसाठी तात्पुरते नाव आणि चिन्ह आयोगाकडे मागण्याची सूचना दोन्ही गटाकडे केली. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून तीन नावे आणि तीन चिन्हांची मागणी करणारे पत्र सादर करण्यात आल्याची माहिती उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली. आज शिवसेना भवनात उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

यावेळी बोलताना अरविंद सावंत म्हणाले, आम्ही चिन्ह म्हणून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू असून या तिन्ही चिन्हापैकी एक चिन्ह मिळावे यासाठी आयोगाला पत्र दिले आहे.

त्याचबरोबर आम्ही ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव ठाकरे, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ अशी तीन नावे सुचविली आयोगास सुचविली असून या तिन्ही पैकी एक नाव मिळावे अशी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, १ ऑक्टोबर १९८९ मध्ये ‘धनुष्यबाण’ या चिन्हाची नोंदणी होण्याआधी शिवसेनेने नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, तलवार, ढाल, मशाल, कप आणि बशी या चिन्हांचा वापर केला होता.

निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाला पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. खोकेवाल्या गद्दारांनी शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *