मुंबई : प्रतिनिधी
१ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. मात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याबाबतचा तपास केला. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. मात्र त्यांचा कोणताही सहभाग असल्याचे आतापर्यंत आढळून आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
भिमा कोरेगांव येथे विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या दलितांवर हल्ला करत हिंसाचाराची घटना घडली. त्या अनुषंगाने एका महिलेने संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा पोलिसात तक्रार दाखल केली. ती तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. तसेच त्याचा तपास करण्यात आला. १ जानेवारीच्या आधी किंवा त्या दिवशीही संभाजी भिडे यांचा भिमा कोरेगांव येथील स्थानिक जनतेशी संबध नसल्याचे आढळून आले. तसेच तेथील कोणाला ते ओळखत नसल्याचेही केलेल्या तपासात उघडकीस आले. त्यामुळे त्यांचा कोणताही या घटनेशी संबध नसल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या २९३ अन्वये मांडलेल्या कायदा व सुव्यवस्था प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
काल सोमवारी अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चाही काढण्यात आला होता. तसेच या मोर्चाचे शिष्टमंडळ अँड.आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भेटायला आले होते. त्यावेळीही त्यांना ही बाब सांगितली आहे. त्यावेळी अँड.आंबेडकर यांनी या अनुषंगाने आणखी नवे पुरावे सादर करणार असल्याचे सांगत एका फेसबुक पोस्टवरील माहिती दिली. त्या अनुषंगानेही आणखी तपास करणार असल्याचे सांगत याबाबत ८ दिवसात कारवाई पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितले.
संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत क्लिन चीट दिलेली असल्याने संभाजी भिडेला अटक होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे.