मुंबई : प्रतिनिधी
अनेक हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदीराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी १ कोटी रूपयांची देणगी शिवसेनेच्यावतीने राम मंदीर न्यासास बँकेच्या माध्यमातून हस्तांतरीत करण्यात आली. मात्र न्यासाचे अध्यक्ष गोपालदास अशी देणगी दिली नसल्याचे सांगत असल्याने हा पैसा गेला कुठे असा सवाल शिवसेना नेते अनिल देसाई यांनी उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ जारी करत यासंदर्भातील माहिती दिली.
देसाई पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी शिवसेनेच्यावतीने एक कोटी रूपयांचा निधी राम मंदीर न्यासाच्या एसबीआय बँकेच्या खात्यात भरले. त्यासंदर्भातील खातरजमा करण्यासाठी न्यासाचे खजिनदार अनिल शर्मा आणि संपतराय यांच्याशी फोनवर बोलणे केले. त्यावर त्यांनी सदरची रक्कम जमा झाल्याचे सांगितले. तरीही एका काही पत्रकारांनी याबाबत न्यासाचे अध्यक्ष गोपालदास यांना विचारले तर त्यांनी अशी देणगी मिळाले नसल्याचे सांगितले. परंतु शिवसेनेने एक कोटी रूपये राम मंदीर उभारणीसाठी देणगी दिलेली असताना मग हा निधी कोठे गेला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वीही राम मंदीराच्या नावाखाली जनतेकडून मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा करण्यात आल्या. मात्र त्या देणग्यांचे मागील काळात काय झाले याचे उत्तर अद्यापपर्यत विश्व हिंदू परिषद आणि भाजपाने अद्याप दिलेले नाही. त्यातच आता राम मंदीर न्यासानेच पैसे बँक खात्यात जमा झाल्यानंतर पैसेचे दिले नसल्याचे सांगत असल्याने मंदीर उभारणी आधीच अफरातफरी अर्थात भ्रष्टाचाराला सुरुवात तर झाली नाही ना? अशी शंका नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.