राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टोलेबाजी करत, ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर एका बाईने नारायण राणेंना हरवलं, अशी टोलेबाजी केली. या टोलेबाजीवरून भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, अजित पवारांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, हे मला माहीत नाही. त्यांनी माझ्या नादी लागू नये, नाहीतर मी पुण्यात येऊन त्यांचे बारा वाजवेन, असा थेट इशारा दिला.
तर ठाकरे गटाकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या ४० आमदारांवर खोके गटाचा आरोप करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या या आरोपांना उत्तर देताना नारायण राणे खोक्याचा जे नेहमी आरोप करतात त्यांच्या खोके घेतानाच्या अनेक कॅसेट माझ्याकडे आल्या असून त्या योग्य वेळी बाहेर काढू असा इशाराही उध्दव ठाकरे यांना दिला.
नारायण राणे हे नाशिक दौऱ्यावर आज आले असताना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नारायण राणे पुढे म्हणाले, माझं पहिलं कार्यक्षेत्र मुंबई आहे. पण बाळासाहेब ठाकरेंनी मला कोकणात पाठवलं. तिकडून मी सलग सहा वेळा निवडून आलो. त्यानंतर काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींनी मला वांद्रे येथून निवडणूक लढवण्यास सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार मी निवडणुकीसाठी उभा राहिलो. मी माझ्या मतदारसंघात उभा राहिलो नव्हतो. पण महिला असो वा पुरुष असो… उमेदवार हा उमेदवार असतो.
तसेच यावेळी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे हे खोक्यांचे व्यवहार करत असतानाचे अनेक कॅसेट आपल्याकडे आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला. या सर्व क्लिप्सचा वापर आपण योग्यवेळी करू.
‘शिवसेना सोडलेले सगळे नेते संपतील पण शिवसेना संपणार नाही’ या दाव्याबाबत विचारलं असता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे दावा करतात, पण त्यांच्याकडे आता काहीही शिल्लक राहिलं नाही. त्यांच्याकडे १५ आमदार आहेत, पण ते आमदार आगामी निवडणुकीपर्यंत सोबत राहतील की नाही? हे माहीत नाही, अशा शब्दांत खोचक टीकाही केली.
यावेळी नारायण राणे म्हणाले, दावा सगळेच करत असतात. पण स्वत: दावा करून काहीही उपयोग नाही. राज्यातील जनतेनं दावा करायला हवा. उद्धव ठाकरे बोलतात, पण त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नाही. त्यांच्याकडे १५ आमदार आहेत, पण ते आमदारही आगामी निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडे राहतील की नाही? हे माहीत नाही. त्यांना कुठलंही अस्तित्व राहिलं नाही. त्यांना सोडून गेलेली लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात? याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं असा खोचक सल्लाही दिला.
नारायण राणे पुढे म्हणाले, माझ्याकडे उद्धव ठाकरेंच्या संभाषणाच्या अनेक कॅसेट आल्या. पण मी त्यातील एकाचाही उपयोग नाही केला. ते शिंदे गटातील आमदारांना खोके-खोके म्हणतात. पण उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करतानाचे कॅसेट माझ्याकडे आले आहेत. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी केवळ खोके जमवले की काही पवित्र कामही केलं, याचं आत्मपरीक्षण करावं. सगळ्या क्लिप्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. पण याचा योग्यवेळी वापर करेन, असंही नारायण राणे म्हणाले.