मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा हा विषय येत्या शैक्षणिक वर्षांपासून अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज येथे विधानसभेत दिली.
राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत शिवसेनासदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी, केंद्रीय, आंतरराष्ट्रीय या सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे., ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या , ज्या खाजगी शाळा शैक्षणिक शुल्काबाबत नियम पाळत नाहीत अथवा गरजेपेक्षा जास्त शुल्क वापरतात अशा शाळांबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभु, आशिष शेलार, भास्कर जाधव या सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले .