Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, फडणवीस कोठेही जाणार नाहीत… पुण्यातून खासदारीसाठी तिकिट द्याच्या मागणीवर व्यक्त केली प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ब्राम्हण महासंघातील संबध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्याबद्दल नाराजी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र पाठवित उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नवनियुक्त भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत. ते कुठेही जाणार नाहीत असे सांगत पुण्यातून खासदारकी लढविणार नसल्याचे स्पष्ट केले.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्विकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपले दौरे सुरु केले आहेत. अकोल्यात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलताना वरील प्रतिक्रिया दिली.

फडणवीस आपला मोर्चा दिल्लीकडे वळवणार का? असे विचारले असता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत. ते कोठेही जाणार नाहीत. तसेच आगामी काळात फडणवीस भाजपा-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री असतील, असे मोठे विधानही केले.

या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. पुढेही करत राहतील. ते दिल्लीला जाणार नाहीत. सध्या येत असलेल्या बातम्या काल्पनिक आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. आगामी काळात ते भाजपा-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री होतील. आमच्यासारखा कोणताही कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करू शकत नाही. या राज्याला देवेंद्र फडणवीसच पुढे नेऊ शकतात. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन असल्याचेही ते म्हणाले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जे पी नड्डा यांना एक पत्र लिहिले होते.“पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडींसोबत उभा होता. २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीष बापट यांना पाठिंबा दिला होता. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळे फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे. जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करणार,” असे या पत्रात म्हणण्यात आले होते.

दरम्यान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीवर भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्ववान नेते आहेत. कर्तृत्वाच्या आधारावरच त्यांचा विचार केला जाणार, या देशामध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा तसेच मागणी करण्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस हे जात, धर्माच्या वर आलेले आहेत. ते एक कर्तृत्ववान नेते आहेत. त्यामुळे त्यांचा विचार हा त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारेच झालेला आहे. त्यामुळे मागणी कोणीही करू शकतं असे मत व्यक्त केले होते.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *