महाविकास आघाडीचे सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी देण्यात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत तेव्हाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांना शिंदे गटाचा विरोध पत्करून पुन्हा अर्थ खाते दिले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची काय प्रतिक्रिया असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली. या अनुषंगाने शिंदे गटाचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता ते म्हणाले, युतीच्या सरकारला राष्ट्रवादीने बिनशर्त पाठींबा दिला.
दीपक केसरकर म्हणाले, हे युतीचं सरकार आहे आणि युतीच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देताना देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला विकास आणि या सरकारचा विकास पाहून राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दिला आणि आमच्या सरकारमध्ये आले.
संजय राठोडांचं खातं का काढलं? यावर दीपक केसरकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला जी खाती हवी होती ती खाती ज्यांच्याकडे होती त्यांना विचारलेलं असणार आहे. संजय राठोड आणि माझी भेट झालेली नाही. परंतु अब्दुल सत्तार यांची भेटी झाली होती. त्यांनी सांगितलं की, कृषी खातं राष्ट्रवादीला दिलं तर चालेल का असं त्यांना विचारण्यात आलं. त्यांनी हो म्हणून सांगितलं.
पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, याचा अर्थ विचारून खाती घेतली आहेत. आम्ही आपआपसात समजुतीने सगळं करत असू तर माध्यमांनी त्यात संशय घेण्याचं काही कारण नाही. अब्दुल सत्तार हे त्यांच्या मतदारसंघातून अनेक वर्षांपासून प्रचंड बहुमताने निवडून येतात. यापुढेही ते निवडून येतील. त्यांना जे खातं दिलं गेलं ते यापुढेही चांगलं चालवतील याची मला खात्री आहे, असा विश्वासही व्यक्त केला.