केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची आज पहिल्यांदाच कोकणात आले होते. यावेळी खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या सभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर खरमरीत समाचार घेतला. यावेळी केलेल्या भाषणात भास्कर जाधव म्हणाले, रामदास कदम हे रोज सगळ्या गावात फिरतात आणि सांगतात उध्दव ठाकरेंनी मला संपवलं. रामदास कदम हे झपाटलेल्या तात्या विंचू आहेत. त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दिला.
या सभेत बोलताना पुढे बोलताना भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांचा समाचार घेत, शिंदे सरकारवर घणाघात केला. विधानसभेत मला चारही बाजूनं घेरण्याचं काम सुरु आहे. मला बोलू दिलं जात नाही. पण, माझा आवाज बंद करण्याची तुमच्या बापाची हिंमत नाही, असा हल्लाबोल शिंदे गटावर केला.
भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही जनतेचे सरकार म्हणता, ‘सबका साथ, सबका विकास’च्या घोषणा देतात. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सरकारने दिलेले पैसे तुम्ही रोखले. हेच का तुमचं ‘सबका साथ सबका विकास.’ बोलायचं फक्त, पण तसं करायचं नाही.
रामदास कदम हे झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू आहेत. रोज सगळ्या गावात फिरतात आणि सांगतात, उद्धव ठाकरेंनी मला संपवलं. खरे तर उद्धव ठाकरेंनी यांच्यासारखी बांडगुळं का बाळगली होती, काय माहिती. आदित्य ठाकरेंनी माझ्याबाजूला बसून रोज कामं करुन घेतली. परंतु, ह्यांना साधं पर्यावरण म्हणतात येत का?, असा खोचक सवाल रामदास कदमांना विचारला.
कोरोनाच्या संकटात रामदास कदम कधी मतदारसंघात फिरले का? एकाही गावात हे गेले नाहीत. गेली ५ वर्षे मंत्री होते. मतदारसंघात एक रुपयांचं काम केलं नाही. आपला मुलगा दापोलीतून निवडून आणण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून जे काही पैसे आणले ते मतदारसंघात दिले, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला.
रामदास कदमांना मातील घालायचं असेल, तर संजय कदमांना येथे आणावं लागेल. याबद्दल आमचं एकमतं झालं आहे. अनेकांवर केसेसे झाल्या, जप्ती करण्यात आली, माझं घर जाळण्याचं काम केलं. मात्र, रामदास कदमांसारख्या भंपक माणसाला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही भास्कर जाधव यांनी दिला.