पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणूकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीने कसबा मतदारसंघातील मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला. तर चिंचवडमधील मविआच्या उमेदवार नाना काटे यांना पाठिंबा देण्याबाबत कोणीच विचारलं नसल्याचे थेट भाष्य करत बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहिर केला. त्यानंतर वंचितने कलाटेंना पाठिंबा दिल्याने नाना काटेंचा पराभव झाल्याची चर्चा सुरु झाली. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होणार का याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, आगामी निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एकत्रित सामोरे जावे अशी इच्छा आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचा समावेश मविआत व्हावा की नाही हे मला माहित नाही कारण त्या चर्चेत मी नसतो असे सांगत थेट भाष्य करण्याचे टाळले.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचा लवकरच महाविकास आघाडीत समावेश होईल, असे तर्क-वितर्क लावले जात होते. पण वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचीही चर्चा होती.
या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात युती होणार का? यावर भाष्य केलं आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, मला याबद्दल माहीत नाही. कारण मी त्या चर्चेत नसतो. निवडणुकीला सामोरं जाताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढावी, अशी आमची विचारधारा आहे असे स्पष्ट केले.
शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या विधानाबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, घोडा मैदान जवळ आहे. योग्य वेळी सर्व परिस्थिती समोर येईल. मात्र एक गोष्ट मी याठिकाणी सांगू इच्छितो की, शिवसेना आणि वंचितची युती आहे. उरलेल्यांच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही असे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले.