केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभेनिमित्त आले होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या देशद्रोही विधानावरून चांगलाच दम भरत म्हणाले, आम्हाला देशद्रोही म्हटला असता तर जीभ हासडून टाकू असा सज्जड इशारा देत हे मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर मिंदेना बोलत आहे असा थेट हल्लाबोलही केला.
एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, राजन साळवी, अनिल परब हे काय देशद्रोही आहेत का? १९९२-९३ ला जेव्हा मुंबईत सगळं पेटलं होतं. त्यावेळी अनिल परबांसारखे सगळे शिवसैनिक तिकडे होते. ते शिवसैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटत आहेत का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेला प्रत्युत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, मेघालयात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तिकडे अमित शाह जाऊन मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. निवडणूका झाल्यावर पंतप्रधानांनी ट्वीट केलं, आपण दोघं मिळून सरकार स्थापन करु. निवडणुकीत भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि लोकांनी उताणं केल्यावर सत्तेसाठी गोंडा घोळायचा. पुण्यात अमित शाह म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले. मग तुम्ही संगमाचं काय चाटत आहात?, असा खोचक सवालही केला.
खेडमधील गोळीबार मैदानात बोलता उद्धव ठाकरेंनी म्हटलं, अमित शाह कुटुंब आणि परिवाद वाद यावर बोलतात. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिमाने सांगतो, बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे, होय मी प्रबोधकारांचा पुत्र आहे. ठाकरेंची ६ वी पिढी महाराष्ट्रातील जनतेसाठी राबत आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिच्छा काय आहे? तुमची वंशावळ कोणती ते आम्हाला सांगा, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
कसब्यात साफ झाले, चिंचवडमध्ये गद्दारी झाली नसती, तर सुफडा साफ केला असता. अंधेरीत निवडणूक लढायची हिंमत नव्हती. मेघालयात अमित शाहांनी कॉनराड संगमांवर भयानक आरोप केले. कुटुंबाच्या हातात राज्य आहे, गरीबांचा पैसा खाल्ला, मेघालय देशातील सर्वात भ्रष्ट राज्य सरकार आहे. तरीसुद्धा संगमांनी यांना उताणं केलं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.