मुंबई : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून बाजारात कांद्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजारात कांदा विकण्याऐवजी रस्त्यावर फेकून देणे पसंत केले. या घसरणाऱ्या किंमतीपासून हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल २०० रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आज बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दर
कांद्याच्या उत्पादकांना दिलासा देण्यासाठी एकूण १५० कोटी रुपये अनुदानापोटी देण्यात येणार आहेत . ज्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत आपला कांदा कमी दरात विकलेल्या कांदा उत्पादक शेतकरी हा या अनुदानासाठी अर्ज करू शकतो. एकूण ७५ लाख मेट्रिक टन कांद्याच्या व्यवहाराला हे अनुदान देण्यात येणार असून नोव्हेंबर १८ ते २५ डिसेंबर पर्यंत खरेदी झालेल्या ७५ लाख मेट्रिक टन कांद्याच्या खरेदीलाही याचा लाभ मिळणार आहे .
गेल्या दोन महिन्यात नाशिक आणि इतर ठिकाणी कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा रस्त्यावरही फेकून दिला होता. काही ठिकाणी तर दीड रुपये प्रति किलो दराने कांदा विकला गेला होता. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. यातच नाशिक येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेत मंत्री ऐकत नसतील तर कांदा फेकू नका तर मंत्र्यांना कांदा फेकून मारण्याची सल्ला शेतकऱ्यांना दिला होता. दरम्यान शेतकऱ्यांच्या स्तिथीला अनुसरून आज सरकारने कांदा उत्पादकांना दिलस देण्याचा प्रयत्न केला आहे .