आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या विकासासाठी शासनाने ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे म्हणून मंत्रालया समोर सामुहीक आत्मदहन करण्याच्या हेतूने मंत्रालयाकडे निघालेल्या १३ आंदोलकांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले.
या विषयी प्राप्त माहितीनुसार ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’च्या वतीने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शासनाने ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे म्हणून सामुहीक आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानुसार शासनाने त्यांच्या मागणीची, निवेदनाची दखल घेऊन ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन न केल्यामुळे संघर्ष समितीचे पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. या बाबींची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने आंदोलकांचे मोबाईल ट्रॅक करून आंदोलकांना बोलार्ड इस्टेट, मुंबई येथून ताब्यात घेतले. ही कारवाई दारव्हा पोलीस स्टेशन, जि. यवतमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त काशीद, मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन यांनी केली.
यावेळी त्यांनी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभसेटवार, सचिव ब्रह्मानंद चक्करवार, गोविंद केशवशेट्टी, अनिल डूब्बेवार, संतोष उत्तरवार, मयूर मामीडवार, मनोज तम्मेवार, सिताराम देबडवार, राजकुमार मुत्तेपवार, बालाजी पांपटवार, नरेश ऱ्याकावार, संतोष फुटाणे, दिनेश पेकमवार आदींना ताब्यात घेऊन त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले. पोलिसांच्या या सतर्कत्यामुळे मोठा अनर्थ ठरल्याचे बोलल्याजात आहे.