पुणेः प्रतिनिधी
भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी जमलेल्या दलित समुदायांवर सकाळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात थोरल्या बाजीरावांनंतरचा पेशवाईचा काळ हा काळा इतिहास म्हणून ओळखला जातो. त्यावेळच्या प्रथा, परंपरांच्या विरोधात त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह अनेकांनी लढा पुकारला. मात्र १ जानेवारी १८१७ च्या आसपास इंग्रज आणि पेशवाई यांच्यात भीमा कोरेगांव येथे लढाई होत पेशवाईचा पाडाव झाला. त्यावेळी इंग्रजांच्या फलटनीत असलेल्या महार जातीच्या सैनिकांनी हा लढा मोठ्या नेटाने लढत पेशव्यांचा पराभव केला. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात कोठेही पेशवाईचा पराभव म्हणजे मराठेशाहीचा पाडाव म्हणून फारशी नोंद नसल्याने राज्यातील पुरोगामी विचारवंताकडून आणि कार्यकर्त्यांकडून हा दिवस विजयी दिवस म्हणून साजरा करतात.
गेल्या अनेक वर्षांपासून हा दिवस साजरा करण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून दलित आणि पुरोगामी विचाराचे कार्यकर्त्ये भीमा कोरेगांव येथे येतात. यादिवशी या विजयी स्तंभाच्या आजूबाजूला पुस्तकांची दुकाने आणि हॉटेल्स थाटली जातात. दिवसभरात हे आलेले कार्यकर्त्ये विजयी स्तंभाला मानवंदना देवून परत जातात. तसेच या विजयी स्तंभास भारतीय लष्कराकडूनही मानवंदना दिली जाते.
मात्र या विजयाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक पुणे जिल्ह्यात या दिवसाच्या विरोधात विखारी प्रचार करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे १ जानेवारीला जमा होणाऱ्या कार्यकर्त्यांना मानवंदना देवू द्यायची नाही अशा पध्दतीने त्याची व्युहरचना करत होते. अखेर त्याचे पर्यावसन आज मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्ये भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी आले असता या कार्यकर्त्यांना पाणी-जेवण देवू नका त्यांना जागा देवू नका अशा पध्दतीची अरेरावी सुरु झाली. त्यातून किरकोळ वाद निर्माण होताच समाजकंटकांनी आलेल्या कार्यकर्त्यांवर आणि वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवित समाजकंटकांना पळवून लावले.
या घटनेच्या विरोधात भीम आर्मी या समाजिक संघटनेसह अन्य संघटनेनांनी पोलिसात तक्रार दाखल केली.