मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक खाजगी रूग्णालयांनी आणि डॉक्टरांनी स्वत:ची क्लिनिक बंद केल्याने राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या इतर आरोग्याच्या तक्रारीवर इजाल होईनासा झाला. त्यामुळे ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्यावतीने (आयएमए) तालुकास्तरावर ‘रक्षक’ क्लिनिक सुरू आणि मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करणाचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसल्याचा निर्वाळाही त्यांनी॰ यावेळी दिला.
कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे. सध्या १२० रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.
मुंबईतील धारावी भागात लॉकडाऊन प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता असून सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.
मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जेथे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तेथे नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे सांगतानाच मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचे बंधनकारक केले.
राज्य कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसून याबाबत आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून तसे घोषित केले जाते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असताना खासगी दवाखाने सुरू करावे यासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी आज इंडियन मेडिकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयएमएच्यावतीने शहरी भागात मोबाईल आणि कम्युनिटी क्लिनिक तर ग्रामीण भागात रक्षक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याक्लिनिक मध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल. राज्य शासनाकडून डॉक्टरांच्या सुरक्षेची आवश्यक ती साधने पुरविण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या संकटकाळात सामान्य जनतेला खासगी रुग्णालयातूनही उपचार मिळावे अशी अपेक्षा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.