केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरवर दिल्या जाणाऱ्या २०० रुपयांच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता ही सबसिडी प्रति एलपीजी सिलिंडर ३०० रुपये होणार आहे. गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. किमतीत कपात आणि सबसिडी वाढल्यानंतर उज्ज्वला लाभार्थींना एलपीजी सिलिंडर सुमारे ७०३ रुपयांना मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, सरकारने बुधवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी सबसिडी सध्याच्या २०० रुपयांवरून ३०० रुपये प्रति सिलिंडर केली आहे. ते म्हणाले की, सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना अतिरिक्त ७५ लाख एलपीजी कनेक्शन देण्यास मान्यता दिली होती.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, पुढील तीन वर्षांमध्ये अतिरिक्त एलपीजी जोडण्या दिल्या जातील. त्यामुळे १६५० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडेल. उज्ज्वला २.० च्या विद्यमान पद्धतीनुसार, लाभार्थ्यांना पहिले रिफिल आणि स्टोव्ह देखील विनामूल्य प्रदान केले जातील.
महिनाभरापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने एलपीजी सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला होता. त्यानंतर ११०० रुपयांना मिळणारा सिलेंडर आता ९०० रुपयांना मिळत आहे. या निर्णयामुळे १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत प्रति सिलेंडर १,१०३ रुपयांवरून ९०३ रुपयांवर आली आहे.
३०० रुपये अनुदान देण्याच्या निर्णयामुळे ९.६ कोटी उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. २०० रुपये प्रति सिलिंडरच्या पहिल्या कपातीनंतर एकदा सबसिडी लागू झाल्यानंतर उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर ७०३ रुपये होईल. देशात ३१ कोटींहून अधिक घरगुती एलपीजी ग्राहक आहेत, ज्यात ९.६ कोटी उज्ज्वला लाभार्थी आहेत.