२० व्या बालकुमार साहित्योत्सवाचे डॉ. भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते उदघाटन
मुंबई : प्रतिनिधी
केवळ मराठी भाषा संमेलने करून मराठीची वाढ होणार नाही. मराठी भाषेत रोजगार उपलब्ध व्हायला हवा. मात्र, मराठीचा दर्जा वाढविण्यात आपले शासन संवेदनशील नसल्याची खंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे व्यक्त केली.
जगातील कोणताही विषय किचकट नसतो. साहित्य निर्माण करण्यासाठी विद्वेतेपेक्षा संवेदशीलता महत्वाची असल्याचा मौलिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
खार पूर्व येथील अनुयोग शिक्षण संस्था आयोजित दोन दिवसीय २०व्या बालकुमार साहित्योत्सवाचे उदघाटन गुरूवार सायंकाळी २७ डिसेंबर रोजी माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष विद्याथी सोनाली जाधव, स्वागताध्यक्ष क्षितिजा पटेल, शालेयमुख्यमंत्री ओंकार पाटील, यश लाड दिव्यारानी तपकीर आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्याशी संवाद साधतांना ते बोलत होते.
जगातील दहा मोठ्या देशामध्ये लहान मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिले जाते. लहानमुलांवर कोठेही ओझे न टाकता त्यांना समजेल अशा मातृभाषेत त्यांना शिकवले जाते. मातृभाषेतून शिक्षण देताना मुलांना त्यांचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख होते. इंग्रजीला विरोध न करता उत्तम इंग्रजी यायलाच हवे. मराठी इंग्रजीचा वाद निव्वळ मूर्खपणाचा असल्याचे ही ते म्हणाले.
चांगले साहित्य निर्माण करण्यासाठी समाज संवेदनशील असावा लागतो. संवेदनशीलता ही शाश्वत आहे. साहित्यिक होण्यासाठी विद्ववतेची गरज नसते. मात्र, चिंतन, मनन आणि संवेदनशीलताच सकस साहित्य निर्माण करते. विद्यार्थ्यांचे आयुष्य हे शाळाच घडवत असते. संवेदना ही जगातील शाश्वत कल्पना आहे. अनुयोग शाळेच्या २०व्या बालकुमार साहित्य संमेलनाप्रमाणे इतर ही शाळांनी अध्यक्ष केंद्रीत साहित्य संमेलने आयोजित करावी. पंतप्रधान जरी व्यासपीठावर असले, तरी संमेलन अध्यक्ष मध्यवर्ती स्थानी बसले पाहिजे असा चिमटाही त्यांनी साहित्य संमेलन भारविणाऱ्यां काढला.