मुंबईः प्रतिनिधी
मोदीसाहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला.
देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे. आणि देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजाराचे कर्ज करुन ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
नोटाबंदी, जीएसटी चुकीच्या अंमलबजावणीमुळे काही प्रश्न या देशाच्या अर्थव्यवस्थेत निर्माण झाले. हे जे ३० – ४० लाख कोटीचे कर्ज मागच्या साडेचार वर्षांत वाढले तो पैसा गेला कुठे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
३० लाख कोटी रुपये उभे केले ते कशावर खर्च केले. देशावर कर्जाचा डोंगर उभा केलात तर त्यातून संरक्षणावर किती, देशातील रस्त्यावर किती खर्च केले याचा हिशोब मोदी सरकार देणार नाही. आज पानभरुन वृत्तपत्रात जाहिराती यायला लागल्या आहेत. एका वृत्तपत्रात दोन दोन – तीन तीन जाहिराती दिल्या गेल्या आहेत यावर लाखो कोट्यावधी रुपये खर्च केले जात असल्याचेही ते म्हणाले.
या देशात भाजप कामापेक्षा जाहिरातीवर जास्त खर्च करत आहे. प्रवासावर खर्च वाढला आहे. परदेशी वाऱ्यावर खर्च जास्त झाला आहे. कामांपेक्षा जास्त गाजावाजा करण्यात आला आहे. त्यामुळे साडेचार वर्षांत वाढलेल्या कर्जाचा हिशोब मोदींना द्यावाच लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
Tags economical condition jayant patil ncp pm narendra modi
Check Also
चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…
लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …