केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दांत निर्मला सीतारमण यांनी टीका केली आहे. अदानी प्रकरणावरून राहुल गांधी सध्या आक्रमक झाले आहेत. अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुठून आले? असा प्रश्न विचारत आहेत. यावर आता निर्मला सीतारमण यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बिनबुडाचे आरोप करण्याची राहुल गांधींना सवय आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीही आपल्याला सगळ्यांनाच याचा प्रत्यय आला आहे. आता पुन्हा एकदा अदानी अदानी हे नाव घेत ते अकारण बिनबुडाचे आरोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोटे आरोप करून राहुल गांधी तोंडावर पडतात तरीही त्यातून बोध घेत नाहीत असा खोचक टोलाही लगावला.
तसेच निर्मला सीतारामण पुढे बोलताना म्हणाल्या, केरळ सरकारने अदानी यांना केलेल्या मदती विरोधात आणि राजस्थानच्या कंपनीने जे सौर उर्जा योजनेचं काम अदानींना दिलं आहे, त्याबाबत राहुल गांधी काहीच का बोलत नाहीत? याबाबत बोलण्यासाठी राहुल गांधींना कुणी अडवलं आहे असा उपरोधिक सवालही केला.
तत्कालीन काँग्रेस सरकार केरळमध्ये असताना एका बंदरासंदर्भातला प्रकल्प कुठलीही निविदा न काढता अदानींना देण्यात आला होता. आता केरळमध्ये काँग्रेसचं सरकार नाही तिथे माकपची सत्ता आहे, मात्र त्याबाबत राहुल गांधी यांनी सोयीस्कर मौन स्वीकारलं असल्याचा आरोपही अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केला.