गेल्या काही दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे अखेर राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौरा स्थगित करण्याची पाळी आली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतलाय. आता रोज उठून माफिया सेनेचे लोक एकमेकांना जय रामजी की, नमस्कार, जय महाराष्ट्र म्हणत नाही, तर आदाब म्हणतात अशी खोचक टीका करत एकाबाजूला मनसे आणि दुसऱ्याबाजूला माफिया सेना यांच्यात भांडण सुरु असल्याचा दावा केला.
राम हा हिंदुस्थानातील देव आहे. रामाच्या चरणी कोणालाही जायला सूट असते. रामजन्मभूमी मंदिरात दर्शनासाठी कोणीही जाऊ शकतं. सगळ्यांना त्याचा अधिकार आणि सूट आहे. हे दोन विषय वेगळे आहेत असेही त्यांनी सांगितले. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, ३१ जानेवारीला अनिल परब यांनी ९० दिवसांमध्ये त्यांचा रिसॉर्ट पाडावा असा आदेश निघाला होता. ३ मे रोजी ९० दिवस संपले आहेत. आता केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मला आश्वासन दिलं आहे की आता रिसॉर्ट पाडण्याच्या दृष्टीने अंतिम आदेश दिला जाईल.
जितेंद्र नवलानी यांनी केलेल्या आरोपांवरही किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, माझ्यावर जितेंद्र नवलानी यांनी नाही तर उद्धव ठाकरे यांनी आरोप केले होते. त्यांनी पंतप्रधानांवर, केंद्र सरकारवर, ईडीवर, ईडीच्या चार अधिकाऱ्यांवर आणि किरीट सोमय्यांवर आरोप केले होते. हे सगळे ब्लॅकमेलिंग करतात, पैसे जमवतात असे आरोप करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा तमाशा केला असा आरोपही त्यांनी केला.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाला चौकशी करायला लावली. त्या चौकशी अहवालात काय सापडलं? उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर ईओडब्ल्यूचा अहवाल सार्वजनिक करावा. ते खोटारडे आणि डरपोक मुख्यमंत्री आहेत. ईओडब्ल्यूने अहवालात आरोपांमध्ये काहीच दम नाही असं लिहून दिलंय. तक्रारदार बदमाश आहेत असंही लिहून दिल्याचा दावा त्यांनी केला.
यानंतर उद्धव ठाकरे यांनी माफिया कमिशनर संजय पांडे यांना आदेश दिले. त्यांनी क्राईम ब्राँचला सांगितलं. यानंतर एसआयटीने ४० दिवस काम केलं, अनेकांचे जबाब घेतले पण काहीच निघालं नाही. म्हणून आता उद्धव ठाकरे घाबरले आहेत. आता संजय पांडे यांनी भ्रष्टाचार विरोधी विभागाला चौकशी करण्यास सांगितल्याचेही त्यांनी सांगितले.
Tags ayodhya tour bjp ex mp kirit somaiya mns mns chief raj thackeray shivsena
Check Also
लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …