मुंबई : प्रतिनिधी
राज्यात इंजिनियरींग अर्थात तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांना कॉलेज सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशा नव्या संस्थांना परवानगीसाठी आता १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी अर्ज करता येतील. यादृष्टीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
कोविडमुळे १० वी नंतर आणि १२ वी नंतरच्या विविध अभ्यासक्रमासाठी असलेल्या सीईटी परिक्षा राज्य सरकारने रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरींगच्या विविध अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने इंजिनिअरींगचे कॉलेज सुरु होण्याची शक्यता, तसेच आहे त्या कॉलेजमध्ये वर्गांची संख्या वाढविणे, नवा विषय कॉलेजमध्ये सुरु करण्याची तयारी अनेक संस्थांनी केली आहे.
त्यामुळे राज्यातील नव्याने इंजिनिअरींगचे कॉलेज सुरु करू इच्छिणाऱ्या संस्थांना आणि नवे विषय, वाढीव तुकड्या आदी गोष्टींना परवानगी मिळविणे आवश्यक असते. त्यामुळे असा पध्दतीचे प्रस्ताव राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाकडे सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
त्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये व्यवस्थापनांना नवीन शैक्षणिक संस्था सुरु करण्याच्या परवानगीसाठी १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मंडळाच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येईल. असे अर्ज शासनाकडे १० ऑक्टोंबर, २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी पाठविण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ज्या व्यवस्थापनांना नवीन पाठयक्रम, जादा विद्याशाखा, नवीन विषय आणि ज्यादा तुकड्या सुरु करण्यासंबंधी परवानगीसाठी १५ सप्टेंबर, २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात अर्ज करता येतील. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये संस्था बंद करु इच्छिणारे व्यवस्थापन विहित नमुन्यात १५ सप्टेंबर, २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी मंडळाकडे अर्ज करता येतील.