मुंबईः प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याची अधिकृत घोषणा होत नव्हती. अखेर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज देत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून वर्णी लागणार असल्याचे संकेत दिले. पटोले यांनी आपला राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे संध्याकाळी सुपूर्द केला.
राज्य विधिमंडळाचे आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशन १ मार्च २०२१ रोजी पासून सुरु होत आहे. तत्पूर्वीच हि त्यांनी राजीनामा दिल्याने तुर्तास अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे.
विधानसभा निवडणूकीपूर्वीपासून राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी मागणी नाना पटोले यांच्याकडून काँग्रेस हायकंमाडकडे सातत्याने करण्यात येत होती. मात्र त्यांना प्रत्येकवेळी थांबण्यास सांगण्यात येत होते. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलाविले होते. आज दिल्लीहून मुंबईत परत येताच त्यांनी विधानभवनात येवून आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून प्रदेशाध्यक्ष पदी आक्रमक नेता असावा अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. त्यापार्श्वभूमीवर नाना पटोले यांचे नेतृत्व राज्यातील काँग्रेसची राजकिय पत वाढविण्यास मदत होईल असे सांगण्यात येत आहे.
लवकरच विद्यमान प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात हे ही आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी अटकळ बांधली जात आहे.
दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी मला पदाचा राजीनामा देण्यास सांगितले त्यानुसार मी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे पालन केले. आता पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन असे नाना पटोले यांनी राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.