मुंबई : प्रतिनिधी
तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा तळोजा मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष व्ही. एम. कानडे यांनी आज दिले.
हरित लवादाकडे अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषणासंदर्भात केलेल्या तक्रारीवरुन तळोजा औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रदूषणासंदर्भात एका बैठकीचे आयोजन इंडियन मर्चंट चेंबरमध्ये करण्यात आले होते.
कानडे म्हणाले, तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. त्यासाठी संयुक्त सांडपाणी योजना अत्याधुनिक पद्धतीने कार्यान्वित करण्याची गरज आहे. कासारडी नदीमध्ये रासायनिक पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या परिसरात हवेतील प्रदूषण वाढल्याने मानवाबरोबरच वन्यजीव-पशूपक्षांना देखील त्रास होत आहे. पुढील सहा महिन्यांपर्यंत औद्योगिक वसाहतीतील वायू आणि जलप्रदूषण कमी करण्यासाठी सर्व उद्योजकांनी प्रयत्न करावेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी तपासणी करुन नियंत्रण ठेवावे.
यावेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रसोन गार्गवा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अनंत हर्षवर्धन, तळोजा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सदस्य, तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशन, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणा असोसिएशनचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.