मुंबई : प्रतिनिधी
भिमा कोरेगाव येथील दलितांवर झालेल्या हिंसाचाराप्रकरणातील सुत्रधार संभाजी भिडे याच्यावर पुढील आठ दिवसात कारवाई करण्यात आली नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एल्गार मोर्चाचे निमंत्रक तथा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी देत राज्य सरकारला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिल्याचेही त्यांनी सांगितले.
संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीवरून एल्गार मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून या मोर्चाला मोठ्या संख्येने लोक आले असून या मोर्चाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना शिष्टमंडळासह चर्चेसाठी आमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर अॅड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संभाजी भिडेंना गुरू मानणाऱ्या त्यांच्या संघटनेतील रावसाहेब पाटील नामक एका व्यक्तीने समाजमाध्यमांवर भीमा कोरेगाव घटनेसंबंधी गंभीर मजकूर लिहिला आहे. ‘ भीमा कोरेगाव येथे आम्हाला अपेक्षीत असलेला मृतांचा आकडा आपण गाठू शकलो नाही’ अशा आशयाचा हा मजकूर असून मुख्यमंत्र्यांनाही मारायला हवे, असे चिथावणीखोर वक्तव्यही या रावसाहेब पाटील यांनी फेसबुकद्वारे केल्याची खळबळजनक बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चिथावणीखोर वक्तव्य केल्याबाबत अगोदर या रावसाहेब पाटीलवर आणि त्याच्या माध्यमातून भिडेंवर कारवाई करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच सर्व बाबी स्पष्ट असतानाही जर पोलीस भिडेंवर कारवाई करत नसतील, तर पोलीस यंत्राणाच बरखास्त करावी, अशी संतप्त मागणी केली. यावर येत्या आठ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली असून आजचे आंदोलन हा निव्वळ सरकारला इशारा असून आठ दिवसांत भिडेंवर कारवाई न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पंतप्रधान भिडेला वाचवित आहेत : आंबेडकरांचा खळबळजनक आरोप
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंना पंतप्रधान मोदी पाठीशी घालत आहेत,त्यामुळेच राज्य सरकार भिडेंवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा खळबळजनक आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र सध्या आम्हाला पंतप्रधानांशी भांडायचे नसून भिडेंना अटक हा आमचा प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे येत्या आठ दिवसांत भिडेंवर कारवाई न केल्यास पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा अॅड. आंबेडकर यांनी दिला आहे.