Breaking News

धीरेंद्र महाराज विरोधात गुन्ह्यास पोलिसांचा नकारः श्याम मानव म्हणाले, आता न्यायालयच सांगेल पोलिस म्हणतात आम्ही सहा तासाचे फुटेज तपासले त्यावरून कायद्याचा भंग होत नाही

नागपूरात आपल्या दिव्यशक्तीच्या आधारे एका पत्रकाराच्या चुलत्याचे आणि त्याच्या कुटुंबियांची माहिती जाहिररीत्या सांगणाऱ्या बागेश्वर मठाचे धीरेंद्र महाराज यांना अंधश्रध्दा निर्मिुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी खुले आव्हान दिले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली. मात्र नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी धीरेंद्र महाराज विरोधात गुन्हा नोंदविता येत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर श्याम मानव यांनी याप्रश्नी न्यायालयात जाणार असल्याचे जाहिर करत देत आता न्यायालयच सांगेल असा इशारा पोलिसांना दिला.

धीरेंद्र महाराजांच्या नागपुरातील दिव्य दरबारात जादुटोणाविरोधी कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचे पोलिसांनी जाहिर केल्यानंतर यावर आता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

श्याम मानव म्हणाले, आता आमच्यासमोर न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा जो निर्णय आहे त्याचा हा थेट अवमान आहे. असं असलं तरी मी शासनाच्या समितीच्यावतीने तक्रार केलेली असल्याने आधी शासन स्तरावर जे शक्य आहे ते प्रयत्न करत आहे. शेवटी न्यायलयच ही विचारेल की, तुम्ही आधी काय केलं. त्यामुळे हे सर्व न्यायालयाच्या समोर ठेवण्यासाठी तशी संधी मिळावी पाहिजे, असे मत व्यक्त केले.

शासन स्तरावर प्रयत्न करूनही प्रशासन असा निर्णय घेत नसेल आणि कायदा लागू होत नाही असं म्हणत असेल तर मग न्यायालयानेच कायदा लागू होतो की नाही यावर निर्णय द्यावा, अशी मागणी केली जाईल, असंही श्याम मानव यांनी स्पष्ट केले.

यावेळी श्याम मानवांनी त्यांच्या एका जुन्या अनुभवाचाही पुनरुच्चार केला. ते म्हणाले, २००५ मध्ये आदिवासी राज्यमंत्री म्हणाले होते की, हा कायदा तयार झाल्यावर तो केवळ आदिवासी-दलितांनाच लागू होईल आणि उच्चभ्रूंना लागू होणार नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की, कायदा सर्वांसाठी सारखा असतो. कोणीही सुटणार नाही. आता त्यांचं वाक्य माझ्या मनात सारखं घोळत आहे. आता त्यांचं म्हणणं किती खरं होतं याची प्रचिती मला येत आहे.

आतापर्यंत या कायद्यांतर्गत शेकडो लोकांवर कारवाई झाली आहे. मात्र, आता जाहिरपणे याने करणी केली, त्याने जादुटोणा केला असं सांगणाऱ्या माणसावर हा कायदा लागू होत नाही. हे फारच हास्यास्पद आहे. त्यामुळे सरकारने या कायद्याचा पुनर्विचार केला आहे असा अर्थ होतो, असेही श्याम मानव म्हणाले.

धीरेंद्र महाराजांनी नागपुरात आयोजित केलेल्या दिव्य दरबारात केलेल्या वक्तव्यांविरोधात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, नागपूर पोलिसांनी धीरेंद्र महाराजांविरोधात जादुटोणा कायदा आणि ड्रग अँड रेमेडीज कायद्यानुसार कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं स्पष्ट केले. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी २५ जानेवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

दरम्यान, नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आम्ही धीरेंद्र महाराजांचा व्हिडीओ बारकाईने पाहिला आहे. त्यात कोणताही चुकीचा प्रकार आढळला नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पोलिसांवर दबाव असल्याचा काहीच प्रश्न नाही. आमच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्ग श्याम मानव यांच्याकडे आहे. त्यावर मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *