देशात समान नागरी कायदा आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे सूचक विधानही केलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशात चार-चार कायदे लागू आहेत. भ्रष्टाचारासंदर्भात जे आपल्याविरोधात आहेत, त्यांना एक कायदा. स्वत:च्या पक्षात आलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना दुसरा कायदा. इथे समान नागरी कायदा का नाही?, असा सवाल संजय राऊत यांनी भाजपाला विचारला आहे.हिंदू-मुस्लीम करून मतांच्या राजकारणाचा हा विषय नाही. हा देशाच्या एकता आणि अखंडतेचा मुद्दा आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
समान नागरी कायद्याचा मसूदा समोर आल्यानंतर ठाकरे गट भूमिका जाहीर करणार का? असा सवाल विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, कायदा कोणताही असो सर्वांसाठी समान पाहिजे. सगळे भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात घेता, त्यांना कायदा लागू होत नाही. दुसऱ्यांवर खटले दाखल करून तुरुंगात टाकता. हा सुद्धा समान नागरी कायद्याचा विषय आहे.
कायदा सर्वांसाठी समान पाहिजे, हीच बाळासाहेबांची भूमिका होती. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारी लोकांसाठी एक कायदा आणि विरोधकांना वेगळा कायदा. ह्याला समान नागरी कायदा म्हणत नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.