मुंबईः प्रतिनिधी
राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असून ते सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचे भाकित करत देवेंद्र हे शिवसैनिकच असल्याचा उल्लेख सुधीर मुनगंटीवार यांनी केला. याच वक्तव्याचा धागा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पकडत सत्ता स्थापनेसाठी तर मग काय भाजपाध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेत प्रवेश करणार का? असा खोचक सवाल करत टोला लगावला.
राज्यातील सत्ता वाटपात अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव आला तरच बोलणी सुरू होतील असे सांगत ‘ठरल्या प्रमाणे करा’ असा आमचा एका ओळीचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी भाजपा नेत्यांना सांगितले.
तसेच आमच्याकडे पर्याय आहे, त्याशिवाय आम्ही बोलत नाही. असे सांगत संख्याबळ झालेलं आहे, ते आम्ही सभागृहात दाखवू. शिवसेना आशेवर नाही तर आत्मविश्वासावर जगते असे स्षष्ट करत महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविणारच सत्तेची हवस सोडून द्या आणि सांगा की आम्ही सत्ता स्थापू शकत नाही असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले.
सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजप सत्ता स्थापन करत नाही. याचा अर्थ हा होतो की ते संख्याबळ जमवू शकलेले नाहीत. शिवसैनिक असेल असं म्हणत असाल तर शिवसैनिकाप्रमाणे दिलेला शब्द पाळा, शिवसैनिक नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो, तो चुकीच्या मार्गावर चालत नसल्याची आठवण त्यांनी करून दिली.
जनादेश महायुतीला मिळाला आहे, असं असेल तर मग सत्ता स्थापनेचा ते दावा का सादर करत नाही ? राजभवनाबाहेर चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद ऐकली. 24 तारखेला निकाल लागल्यावर उद्धव ठाकरेंनी हेच सांगितले विधीमंडळ पक्षनेता निवडीमध्ये देखील हेच सांगितले की युती तुटेल असे मी काहीच करणार नाही. अस्थिरता ज्यांच्यामुळे निर्माण होते आहे ते महाराष्ट्राचे नुकसान करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील तो आम्हाला मान्य असेल असे आमदारांनी सांगितले.
शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी एकमुखाने उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला. भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत का हा त्यांना प्रश्न विचारा
शिवसेना आणि उद्धव ठाकरे नेहेमी भूमिकेवर ठाम राहिलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.