मुंबई : प्रतिनिधी
मागील चार वर्षे राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले. मात्र आता निवडणूका जवळ आल्याने कदाचित शिवसेनेला खूष करण्यासाठी या उपाध्यक्षपदावर शिवसेनेच्या विजय औटी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे भविष्यात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचे दिसून येत असून शिवसेनेला राम पावला असल्याची मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी केली.
विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे विजय औटी यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदन करताना अजित पवार यांनी वरील वक्तव्य केले.
निवडणूका जवळ आल्यानेच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबधीच्या शिफारसी केंद्राला पाठविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पण आता अवघे ४ ते ६ महिने राहीले असताना उपाध्यक्ष पद भरण्याचा निर्णय सरकारने घेतला. यावरून नवनियुक्त उपाध्यक्षांना केवळ काही महिन्यांचेच उपाध्यक्ष म्हणून राहता येणार असल्याची बाबही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना वेगळा विदर्भ मागत होते. मात्र आता ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वावरत असताना त्यांनाही गोड वाटत असेल. आता ते सर्वांना सोबत घेवून जात असल्याने त्यांना स्वत:लाच वेगळा विदर्भ नको असे वाटत असेल. त्यामुळे भविष्यात एकच महाराष्ट्र आपल्या सर्वांना पाह्यला मिळेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.