देशाची आणि राज्याची ज्यांच्याकडे सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. मात्र, ती टाकण्याची त्यांची तयारी दिसत नाही. १९७८ ला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा १५ दिवसात मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली, तेव्हा तीन महिन्यांच्या आतमध्ये ७२ हजारो कोटींचे कर्ज माफ केलं होतं, असे सांगत राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपावर हल्लाबोल चढविला.
पुरंदर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार बोलत होते.
मागील १० वर्षात भू-विकास बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले का? कुणी वसूलीला जात नाही. जिथे वसूली होणार नाही तिथे भू-विकास बँकेने कर्ज माफ केले अशी घोषणा राज्य सरकारने २-३ दिवसांपूर्वी केली. संकटग्रस्त शेतकऱ्यांना नियम बाजूला ठेवून माणूस म्हणून मदत करायला हवी. जो संकटात आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायला हवा. अतिवृष्टीमुळे भू गर्भातील पाण्याची पातळी निदान २ वर्षे टिकेल. नुकसान झालंय त्याची भरपाई सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वेळ पडल्यास संघर्ष करू, मोर्चा काढायचा, मागणी करायची. जुने दिवस विसरायचे कारण नाही. पिकांचे जे नुकसान झालंय त्याची भरपाई केंद्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
माझ्याकडे केंद्राची जबाबदारी असताना मी शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना काढली. तेव्हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य केले. आंबे, काजू कोकणात हजारो शेतकरी उत्पादन घेतात. कोकणातला शेतकरी १६-१८ वर्षे झाले की तर मुंबईकडे कामाला जायचा. ६० वय झाल्यानंतर तर परत गावाकडे जायचा. शेती फारशी नव्हती. आज मुंबईला जाण्याची भूमिका कोकणच्या लोकांची नाही. फळबाग योजनेचा फायदा काजू, आंबा , फणस कसं घेता येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्या पदरात कशा पडतील यासाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
मी आता बाहेर फिरू नये असं एकाने सांगितले. पण कुणी सांगितले मी म्हातारा झालोय, तुम्ही काय बघितलंय? मी म्हातारा झालो नाही. वय वाढते असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका आमची आहे. १९८४ साली मी लोकसभेला पहिल्यांदा उभा होतो. तेव्हापासून सुप्रिया सुळे, अजित दाद, संजय जगतापची निवडणूक असेल त्या प्रत्येक वेळी सासवडच्या लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही आमची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.