मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील सद्यपरिस्थिती पाहता मुंबई शहरामध्ये सकाळपासून वीज पूरवठा खंडीत होणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. अशा घटना केवळ जबाबदार व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे घडतात अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मुंबई शहरात २ हजार मेगावॅटच्या वीज वाहिन्या बंद पडल्यामुळे कोरोना रूग्णांना, लोकांना अतोनात हाल सहन करावे लागले आहे. संपूर्ण मुंबई शहर हे सकाळपासून अंधारात आहे. याची सुरूवात तीन दिवसापूर्वी झाली होती. गेल्या तीन दिवसापासून कळवा-तळेगाव केंद्र हे बंद पडलेले. पण यंत्रणांनी काही हालचाल केली नाही. जर वेळीच बंद पडलेल्या वाहिन्या दुरूस्त केल्या असत्या, तर तिसऱ्या वाहिनीवर दाब आला नसता. मात्र, यंत्रणा सुस्त राहिल्यामुळे आज संपुर्ण शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला. ज्या ट्रान्समिशन कंपनीने २५ हजार किलोवॅटचे यशस्वीपणे ट्रान्समिशन केले त्यांच्याकडून अशी चूक घडते हे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
या सगळ्यां घटना नंतर ऊर्जा खात्यातला भोंगळ कारभार दिसून आला आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधित मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.