विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांनाच तुमच्या चिठ्या काढेन असा गर्भित इशारा दिला. त्यावरून विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार करत चांगलेच सुनावले. तसेच शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या मदतीवरून विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आयनॉक्स सिनेमागृहाजवळ उस्मानाबादच्या शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येवरून चांगलेच घेरण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीवरून विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताच उत्तर दिले. हे उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना सततचे करण्यात येणारे आरोप सहनशीलतेच्या पलीकडचे असल्याचे सांगितले. तसेच विरोधकांच्या चिठ्या आपल्याकडे असून ती काढण्याचा इशारा देत नसल्याचे सांगत तो इशाराही दिला. मात्र राज्य कारभार करताना अशा पध्दतीचे आरोप होत असतात. त्यावरून असे इशारे द्यायचे नसतात असा सल्ला दिला.
त्याचबरोबर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आताच जाहिर केले. मात्र उस्मानाबादचा सुभाष देशमुख या शेतकऱ्यांने आपली चर्चा सुरु असताना आत्महत्येचा प्रयत्न केला. यावरून राज्य सरकारने शेतकऱ्यांना किती मदत केली हे दिसून येत असल्याची खोचक टीका केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या बोलण्यावर मध्येच थांबवित म्हणाले, तो शेतकरी उस्मानाबादचा आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. कारण त्याच्या शेतीसंदर्भात कौटुंबिक वाद आहेत. त्याने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो १५ टक्के भाजला आहे. त्याला जीटी हॉस्पीटलला दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी त्याच्या वडीलांनीही अशाच पध्दतीने प्रयत्न केला होता. मात्र त्या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न हा शासकीय मदतीवरून केला नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.