आगामी राज्यातील मुंबईसह १४ महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. त्यातच नुकतेच सी व्होटरने जारी केलेल्या सर्व्हेक्षण अहवालातील अंदाजानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील तर भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर लगेच राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरात ऐनवेळी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये झालेल्या जागा अदला बदलीनंतरही सलग तीन टर्म विजयी होणाऱ्या भाजपाला पराभवाचे आस्मान दाखवित काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी भाजपाचे विद्यमान आमदार ना.गो.गाणार यांचा पराभव करत विजय मिळविला.
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदर डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता आपल्याच मुलाला सत्यजीत तांबे यास अपक्ष आमदार म्हणून अर्ज भरायला लावला. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील विसंवादावरून चर्वित चर्वण करण्यात आले. तसेच तांबे पिता-पुत्रांच्या या बंडखोरीमागे भआजपा असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीला भाजपानेही सत्यजीत तांबे यांच्या पाठिंब्यासाठी योग्यवेळी निर्णय जाहिर करू असे स्पष्ट केले. मात्र शेवटच्या क्षणी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पाठिंबा देत असल्याचे भाजपाच्यावतीने स्पष्ट केले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी तातडीने बैठक घेत शिवसेनेसाठी आधी सोडण्यात आलेली नागपूरची जागा काँग्रेसने दिली. तर काँग्रेसची नाशिकची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय घेत ऐनवेळी जागा बदल करून घेतला. या जागा बदलाचा निर्णय सध्यातरी काँग्रेसला फायद्याचा ठरल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस उमेदवार सुधाकर आडबाले हे १६,५०० मते मिळवित विजय मिळविला तर भाजपाचे उमेदवार ना गो गाणार यांचा जवळपास निम्यापेक्षाही जास्त मतांनी अर्थात ६३९९ मतांनी पराभव केला.
त्यामुळे नागपूरातील विजयाने भाजपाच्या पराभवाची सुरवात तर नाही ना अशी चर्चा सर्वचस्थरात सुरु झाली आहे.