मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाली. या दोन्ही जागां राखण्यासाठी भाजपा-शिंदे गटाकडून आणि महाविकास आघाडीने कंबर कसली. त्यामुळे २८ वर्षापासून भाजपाच्या ताब्यातील जागा काँग्रेस हिसकावून घेणार का? चिंचवडची जागा परत मिळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळणार का यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र कसब्याची जागा परत मिळविण्यात महाविकास आघाडीला यश मिळाल्याने आघाडीत खुशी निर्माण झाली तर चिंचवडच्या जागेसाठी ताकद पणाला लावूनही भाजपाने ही जागा राखण्यात यश मिळविल्याने महाविकास आघाडीला गमचा सामना करावा लागला.
कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. सकाळपासून धंगेकर हे १५ ते २० हजार मतांच्या आघाडीने निवडूण येणार असल्याचे सातत्याने सांगत होते. त्यामुळे दुपारपर्यंत धंगेकर यांनी ११ हजार ०४० मतांची आघाडी कायम राखत अखेर विजय मिळविला.
गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याचं दिसून येत आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला. भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनीही सुरुवातीला १३ फेरीनंतर आपल्याला मतांची आघाडी मिळेल असा दावा केला होता. मात्र त्यांना अपेक्षेनुसार मत मिळाली नाहीत. त्यामुळे धंगेकर आणि रासने यांच्यातील मताधिक्यात मोठ्या प्रमाणावर फरक पडला. तो फरक पार करणे शक्य न झाल्याने अखेर हेमंत रासने यांनी आपला पराभव झाल्याचे मान्य केले.
तर दुसऱ्याबाजूला चिंचवडच्या जागेसाठी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आग्रही होते. त्यामुळे शिवसेनेला आपला दावा सोडावा लागला. भाजपाच्या ताब्यातील ही जागा परत मिळवायचीच म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. तर दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे अर्धेअधिक मंत्रिमंडळ चिंचवडमध्ये ठाण मांडून राहिले. भाजपाने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नींना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उध्दव ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडली. त्यामुळे अश्विनी जगताप यांना चांगली मते मिळाली.
मतमोजणीला सकाळी सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत अश्विनी जगताप यांच्या मताधिक्क कायम राहिले. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानण्यात येऊ लागले. त्यानुसार २० व्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यापेक्षा १४ हजार मताधिक्क मिळत आघाडीवर राहिल्या. १९ व्या फेरीअखेर नाना काटे यांना ५५ हजार ८४८, अश्विनी जगताप यांना ६७ हजार ५५६ तर अपक्ष राहुल कलाटे यांना २२ हजार ३१७ मते मिळाली.