कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतील रंगत आता चांगलीच वाढत चालली असून या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी महाडिक गटाकडून पोटनियमातील तरतुदीनुसार २७ जणांवर हरकत घेतली होती. त्यांना आता अपात्र ठरवण्यात आलं आहे. यानंतर सतेज पाटील यांनी महाडिकांना थेट आव्हान देत म्हणाले, लांग घातली होती, तर कुस्ती खेळायची होती, आम्ही काय गप्प बसलो होतो का? मैदानात यायच्या आधीच महाडिकांनी पळ काढला असा खोचक टोला लगावला.
पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, एवढी खुमखूमी, ताकद आणि सभासदांचा चांगला कारभार केला आहे, तर मैदानात या. उद्याच्या उद्या मैदानात या आणि आमच्या सगळ्या पट्ट्यांना सामोरे जावा. बंटी पाटील पॅनलमध्ये नसला, तरी माझे २१ उमेदवार तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. माझा लढा स्वत:साठी नव्हता. गोकुळमध्ये मी संचालक कधी झालो नाही. तुम्ही गोकुळमध्ये तुमच्या कुटुंबातील माणसं बसवलीत, अशी टीकाही केली.
सतेज पाटील म्हणाले, आपण लोकांच्यात जावूया. लोकांना पटवून देऊया की महाडिक किती भ्याड आहेत. १२ हजार लोकांना भिवून २७ जणांना बाजूला करण्याचा प्रयत्न होता. लांग घातली होती, तर कुस्ती खेळायची होती, आम्ही काय गप्प बसलो होतो का? मैदानात यायच्या आधीच महाडिकांनी पळ काढला, असा हल्लाबोलही केला.
महाडिकांच्या घरातील व्यक्तींनी कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घ्यावी. उमेदवारांमध्ये लढाई होऊ द्या. २१ संचालक कोण असणार याचा निर्णय १२ हजार सभासदांना घेऊ द्या त. कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील कधी मागं पडणार नाही, असं आव्हानही सतेज पाटील यांनी महादेव महाडिकांना नाव न घेतला दिले.
आज रडीचा डाव खेळला. चांगलं केलं, रडीचा डाव खेळला. मी १४ तास राबणार होतो. आता २४ तास राबणार. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे. हा कोणा एकट्याच्या मालकीचा होता काम नये. ही बंटी पाटील आणि १२ हजार सभासदांची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.