Breaking News

हिवाळी अधिवेशानंतर भाजपतंर्गत राजकारणातील घडामोडींना वेग मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच पंख छाटण्याच्या कामाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र अधिवेशनाची सांगता होताच मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत संभावित चेहऱ्यांनी राजकिय वजन खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये असूनही राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांना पाठबळ पुरविणाऱ्या राजकिय मंत्री आणि आमदारांच्या पंख छाटणीच्या कामास सुरुवात झाल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दरवेळी अधिवेशनाच्या पूर्वी आणि नंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर मुख्यमंत्र्यांकडून दाखविले जाते. मात्र तीन वर्षे होत आली तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता. परंतु हिवाळी अधिवेशनाच्या काळात कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या जन आक्रोश मोर्चाला मिळालेला प्रतिसाद आणि गुजरात निवडणूकीत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात भाजपची झालेली पीछेहाट यापार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणूका लक्षात घेत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे जवळपास नक्की करण्यात आले आहे. त्यामुळे विस्तारात भाजपला आणि राज्य सरकारची प्रतिमा बदलण्यास मदत होईल अशा चेहऱ्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय दिल्ली पातवळीवरून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर अधिवेशन काळात विरोधकांनीच भाजपमधील अनेक नाराज आमदार विरोधकां भेटून राज्य सरकारला अडचणीत आणणारे मुद्दे देत असल्याची बाब विरोधकांकडूनच उघडकीस आणण्यात आली. त्यामुळे अशा आमदारांचा शोध घेवून त्यांचे पंख छाटण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर विधिमंडळात न राहताही पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकिय अडचणीत आणणाऱ्यांनाही पक्षातून वेगळे पाडण्याच्या हालचालींना सुरुवात झाली असल्याचे भाजपमधील अन्य एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आयोजित केलेल्या आमदारांच्या शिबिराला पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्यासह २३ आमदारांनी गैरहजेरी लावली होती. या गैरहजेरीची गंभीर दखल पक्षाकडून घेण्यात आली असून त्यांच्यावर पक्षशिस्तीचा बडगा उगरण्याची तयारी सुरु करण्यात आली असल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *