बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांच्या सरसकट फेलोशीप द्यायला सरकारला भाग पाडल्यानंतर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांच्या सरसकट फेलोशिप साठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत .यासंदर्भात पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार असून त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्याची आग्रही सूचना करणार आहेत.
सरसकट फेलोशिपसाठी सलग ५२ दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर बसलेल्या बार्टी च्या८६१ विद्यार्थ्यांना शरद पवार यांनी मध्यस्थी करून फेलोशीप मिळवून दिली होती मात्र ही फेलो शीप जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यासाठी यापुढे २०० इतकी विद्यार्थी मर्यादा निश्चित केली होती. तर बार्टी च्या त्या ८६१विद्यार्थ्यांना केवळ एका वर्षाची फेलो शीप देण्यात आली. त्यामुळे हे विद्यार्थी तसेच त्यांच्यासह नवीन विद्यार्थी आझाद मैदानात धरणे आंदोलन करीत आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेश नेत्या उषाताई चौधरी यांनी या विद्यार्थ्यांना घेवून आज शरद पवार यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी दिली.
राज्य सरकारने सारथी, बार्टी,महाज्योती या स्वायत्त संस्थांमध्ये एकसमान धोरण राबवण्याच्या उद्देशाने या सर्व संस्थांच्या संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या फेलोशिपच्या संख्येत केवळ २०० संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात संशोधक विद्यार्थी राज्यात ठीक ठिकाणी आंदोलन, साखळी उपोषण करत आहेत. २०२२-२०२३ च्या बॅचला फेलोशिप-पात्र संशोधक विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यापीठातील पीचडी नोंदणी दिनांक पासून फेलोशिप मिळावी ही विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करत राज्य सरकारने सारथी, बार्टी,महाज्योती, TRTI या चारही संस्थांच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सीईटी परीक्षेतील सावळा गोंधळ पाहता परीक्षा रद्द करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या लढा सुरू ठेवला आहे. सदर प्रश्नी आपण लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी आणि प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उषाताई चौधरी आणि विद्यार्थ्यांनी यावेळी शरद पवार यांच्याकडे केली.
यावर खा शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळायला हवी याबाबत लवकरच मी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेईन अशी ग्वाही दिली. यावेळी विजय कुले, पेढरेकर, नितीन गायकवाड,मिलिंद सुखदेवे, पल्लवी गायकवाड, प्रवीण पटेकर, सीमा वानखेडे, रोहित टिकूते,जुही खोब्रागडे,दिपाली गडहिरे सह आदी विद्यार्थी उपस्थित होते.