Breaking News

ओखी वादळग्रस्तांना पंचनाम्यानंतर मदत देणार मदत जाहीर करण्यास सरकारची चालढकल

नागपूर : प्रतिनिधी

अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा, काजू आणि मच्छिमार उत्पादकांचे नुकसान झाले. या वादळग्रस्तांना राष्ट्रीय आप्तकालीन परिस्थिती अर्थात एनडीआरएफमध्ये येत नसल्याने या विभागातून नुकसान भरपाई देता येणार नाही. मात्र पंचनामे करून एसडीआरएफ अर्थात राज्य आपतकालीन परिस्थितीतून नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगत नेमकी किती नुकसान भरपाई देणार याविषयी स्पष्ट बोलण्यास मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला.

विधानसभेत सकाळच्या विशेष सत्रात ओखी चक्री वादळामुळे कोकणातील आंबा, काजू उत्पादक आणि मच्छिमारांच्या बोटीचे नुकसान झाल्याचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री पाटील यांनी वरील उत्तर दिले.

कोकणातील आंबा, काजूची एका एकरात किमान १०० झाडे असतात. तुमच्या नियमानुसार त्यांना ६ हजार रूपये एकरी नुकसान भरपाई देता. त्याचा हिशेब केल्यास एका आंब्याला ६० पैसे मिळतील. त्यामुळे इतकी तोकडी मदत देण्याऐवजी एकरी १ लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करीत मच्छीमारीला  शेती व्यवसायाचा दर्जा देणार का असा सवालही भास्तकर जाधव यांनी उपस्थित केला.

यास उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भास्कर जाधव यांच्याकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या धोरणात्मक प्रश्नाबाबत कौतुक करत हे सर्व धोरणात्मक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारून सोडावावे लागतील असे सांगितले. तसेच याबाबत कोकणातील सर्व आमदारांची बैठक बोलावून चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी चंद्रकांत पाटील यांना टाईमपास नको मंत्री महोदय थेट उत्तर द्या अशी सूचना केली. मात्र चंद्रकांत पाटील यांनी कोणतेही उत्तर स्पष्टपणे न देता केवळ वेळकाढूपणा केला. त्यातच वेळ संपल्याचे सांगत तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *