मुंबई: प्रतिनिधी
मागील दोन दिवसात मुंबई शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३ हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला थोपविण्यासाठी आता गर्दीच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची अँन्टीजेन कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देत चाचणीस नकार देणाऱ्या नागरीकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने सर्व वार्ड अधिकाऱ्यांना दिले.
दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून सध्या गर्दीची ठिकाणे म्हणून ओळखले जाणारे अर्थात मॉल, मार्केट, रेल्वे स्टेशन, एसटी बस डेपो, खाऊ गल्ली, पथपद विक्रेते, पर्यटन स्थळे आणि शासकिय कार्यालयांमध्ये अँन्टीजेन कोरोना चाचणी करणे प्रत्येकाला अनिवार्य करण्यात आले असून चाचणी करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेशही बजाविण्यात आले आहेत. तसेच हि चाचणी करण्यासाठी सदर व्यक्तीची सहमती विचारात घेतली जाणार नसल्याचेही पालिकेने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
पालिकेच्या आदेशानुसार मॉलमध्ये येणाऱ्या किमान ४०० जणांची रँपिड अँन्टीजेन चाचणी करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले.
प्रत्येक रेल्वे स्टेशनवर किमान एक हजार जणांची चाचणी करण्यात येणार आहे.
याशिवाय प्रत्येक एसटी बसस्थानकात येणाऱ्या १ हजार प्रवाशांची ही चाचणी करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर शहरातील रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांसोबतच तेथील कर्मचाऱ्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे.