Breaking News

आरोग्य विभागाच्या भरती परिक्षांच्या नव्या तारखा जाहिर, “त्या” क्लिपची चौकशी ९ दिवस पूर्वी परिक्षार्थींना मिळणार हॉल तिकीट-सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
परीक्षा आयोजनातील प्रचंड गोंधळामुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षांच्या नव्या तारखा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जाहीर केल्या. गट क संवर्गासाठी येत्या २४ ऑक्टोबरला तर गट ड संवर्गासाठी ३१ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहेत. परंतु या परिक्षांच्या नव्याे तारखा जाहिर करण्यात आलेल्या असल्या तरी संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ९ दिवसआधी प्रवेशपत्र मिळेल. तसेेच आरोग्य विभागाच्या परिक्षांसदर्भात डॅश बोर्ड करण्यात येणार असून त्यावर परिक्षा केंद्रे, विद्यार्थ्यांच्या याद्या, वेळापत्रक आदींची माहिती सार्वजनिक केली जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६ हजार २०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला लेखी परीक्षा घेतली जाणार होती. राज्यातील १५०० केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा होणार होती. मात्र, गोंधळामुळे भरती परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात बैठक घेऊन परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला आणि परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या.
आरोग्य विभागाच्या परिक्षासंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला या परीक्षेत काही वावगे होत असल्याचे आढळल्यास पोलीसांत तक्रार करा, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.
पदभरती परीक्षेसाठी आयटी विभागाने बाह्यस्रोत कंपन्यांची निवड केली आहे. आयटी विभाग हा सामान्य प्रशासनाच्या अंतर्गत येतो. या विभागाने परिक्षा घेण्यासाठी पाच कंपन्या निवडल्या आहेत. ती निवड फडणवीस सरकारच्या काळात झाली होती. त्यानुसार आरोग्य विभागासाठी न्यासा कंपनी परीक्षा घेणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
त्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीचे आदेश
दरम्यान, आरोग्य विभागातील भरतीसाठी आठ ते १५ लाख रुपये घेतले जात आहेत, असा दावा करणारी ध्वनीचित्रफीत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज जारी केली. त्यावर बोलताना टोपे यांनी त्या ध्वनीफितीची सत्यता किती हा प्रश्न आहे, असे सांगत याप्रकरणी अमरावतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यास सांगितल्याची माहिती दिली. याशिवाय परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी गृहमंत्र्यांना पत्र देणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *