उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी साब इंडियाचे अध्यक्ष जेन वाईडस्ट्रॅाम म्हणाले की, गुंतवणूकीच्या दृष्टीने खरेच हे चुंबकीय क्षेत्र आहे. चुंबकीय देश,चुंबकीय राज्य आणि चुंबकीय नेतृत्त्व असा संगम झाला आहे.भारत योग्य अशा मार्गावर वाटचाल करत आहे. साहजिकच महाराष्ट्राचे मार्गक्रमणही तसेच आहे. मेक-इन इंडिया हे धोरण हे शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण असून संशोधन आणि विकासाची वृत्ती मध्यम उद्योग प्रकल्पामध्येही यावी अशी आशाही व्यक्त केली.
पोस्को इंडियाचे अध्यक्ष गील म्हणाले की, प्रधानमंत्र्याच्या प्रभावशाली नेतृत्त्वाखाली भारत आर्थिक विकास दराच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. अनेक महत्त्वपुर्ण आणि अशक्यप्राय असे आर्थिक सुधारणाचे, करसंरचनेचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच भारत यापुढेही अशीच वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीतच उद्योजकतेचा गुण आहे. प्रधानमंत्र्याचे मेक इन इंडिया हे धोरण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आम्ही जागतिक पटलावरील सर्वात मोठा उद्योग ठरलो आहोत. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन क्षेत्रात मोठे काम करू शकत आहोत.
ह्योसंग उद्योगसमुहाचे अध्यक्ष ह्यों-जो चो म्हणाले, भारताचा कोरियावर मोठा प्रभाव आहे. दोन हजार वर्षांपुर्वीचे दृढ संबंध आहेत. भारत हा सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर असलेला देश आहे. यापुढे भारत हा आर्थिक वृद्धी दराच्या बाबतीत भारत अग्रेसर देश ठरेल.कर सुधारणा, नागरी सुविधा, परकीय संबंधामध्ये सुधारणा यामुळे निश्चितच महात्मा गांधी हे माझ्यासाठी महानायक आहेत. भारताच्या या ध्येयाचा आम्ही निश्चित आदर करू.
महिंद्रा समुहाचे आनंद महिंद्रा म्हणाले, महाराष्ट्रातच आमच्या उद्योग समुहाची वाढ झाली आहे.महाराष्ट्राकडे ग्रामीण महाराष्ट्राची ताकद आहे आणि दुसरीकडे मुंबईची ताकद असल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या एक हजार गावांना मॅाडेल गाव बनविण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याचे मोठे समाधान आहे.गावांबरोबरच मुंबईमध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नात सहभागी होण्याची तयारी आहे.प्रधानमंत्री पर्यटन क्षेत्रालाही मोठे महत्त्व देतात.पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात. त्यामुळेच कांदिवली येथे मोठा प्रकल्प साकारणार आहोत.
टाटा समुहाचे अध्वर्यू रतन टाटा म्हणाले, टाटा उद्योग समुहाची सुरवात महाराष्ट्रातून आणि नागपुरातून सुरवात झाली. जेमशेदजी टाटांनी महिला सुतगिरणी सुरु केली. महाराष्ट्रात पुन्हा गुंतवणूक क्षेत्राला चालना मिळत आहे. महाराष्ट्राचे भवितव्य सर्वांग सुंदर आहे. नव्या सरकारमधील नेतृत्त्वाने यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न केले आहेत. औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे नेहमीच अग्रेसर राहीले आहे. मी उद्योजकांनाही आवाहन करतो की महाराष्ट्र हे गुंतवणूकीसाठी सर्वोत्कृष्ट राज्य आहे. नव्या भारताला साकारताना नव महाराष्ट्र साकारण्यासाठीही योगदान देऊ या असे ते म्हणाले.
एमर्सनचे अध्यक्ष एडवर्ड मॅान्सर म्हणाले,अमेरिका आणि भारत संबंध सातत्याने दृढीकरणाच्या दीशेने वाटचाल सुरु आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले आहे. यातून महाराष्ट्राचे परकीय गुंतवणूकीसाठी सकारात्मक दृष्टी दिसून येते.एमर्सन भारतात गेली अनेक दशके कार्यरत आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपुर्ण कौशल्यांबाबत तसेच संशोधन-विकासाचे काम येथे चालते. प्रधानमंत्री मोदी यांच्या दृष्टीकोनाचे स्वागत करायला हवे. ज्यामध्ये ग्लोबल मार्केट ते लोकल टॅलेंट ही संकल्पना अभिप्रेत आहे. महाराष्ट्रातील एमआयडीसी ही यंत्रणा सर्वोत्कृष्टरित्या कार्यरत आहे. ज्यामुळे अनेक उद्योगांना चालना मिळाली आहे.
व्हर्जीन हायपरलूप वन उद्योग समुहाचे अध्यक्ष रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले, पुणे, मुंबई दरम्यान एक प्रायोगीक पथ निर्मिती प्रकल्प उभारणीचा प्रयत्न सुरु आहे. पुणे ते नवी मुंबई विमानतळाचा प्रवास पंधरा ते वीस मिनिटांत होऊ शकतो. एकविसाव्या शतकातील दळणवळणाच्या क्षेत्रातील मोठी क्रांती करण्याच्या टप्प्यावर आपण उभे आहोत. यातून मोठी सामाजिक आर्थिक क्रांती अपेक्षीत आहे. पुणे- मुंबई हा पहिला राष्ट्रीय पथदर्शी प्रकल्प असेल. पण पुढच्या टप्प्यात अन्य शहरांनाही एकमेकांशी जोडण्यासाठी प्रकल्प आणता येतील.