मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाच्या पहिल्या संसर्गात राज्यातील ४० वर्षावरील नागरीकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळून आले होते. मात्र आता कोरोनाच्या २ऱ्या लाटेत मात्र जन्मलेल्या बालकांपासून ते ४० वर्षे वयाच्या आतील नागरीकांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती पुढे आली असून या वयोगटातील बाधितांची संख्याही चांगलीच चिंताजनक आहे.
राज्यात यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जन्मलेल्या बालकांना किंवा १० वर्षाखालील मुलांमध्ये फारसा प्रादुर्भाव होताना आढळून आले नव्हते. मात्र आता सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेत ० ते १० वर्षाखालील मुलांमध्येही संसर्ग वाढल्याचे दिसून येत असून एकूण रूग्ण संख्येच्या ३.१५ टक्के प्रमाण अर्थात ८७ हजार ८२० बालकांचे निदान झाले आहे. तर ११ ते २० वयोगटातील रूग्णांचे प्रमाण १ लाख ८४ हजार ५९५ इतके असून यांचे प्रमाण ६.६२ टक्के इतके आहे. २१ ते ३० वयोगटातील रूग्णांचे प्रमाण १६.६४ टक्के इतके तर ४ लाख ६३ हजार ८४० रूग्णांची नोंद झाली आहे. ३१ ते ४० वयोगटातील व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून हे प्रमाण २१.२९ इतके असून ५ लाख ९३ हजार ४१३ बाधितांची नोंद आहे. त्यानंतर ४१ ते ५० या वयोगटाचे प्रमाण १८.०५ टक्के असून ५ लाख ३० हजार ६५ इतके बाधित आहेत. याशिवाय ५१ ते ६० वयोगटात ४ लाख ४९ हजार १८७ बाधित, ६१ ते ७० वयोगटात ३ लाख ७ हजार ७७७ बाधित, ७१ ते ८० या वयोगटात १ लाख ४८ हजार ९३६ बाधित आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या कोरोना लाटेत पहिल्यांदाच १० वर्षाखालील बालकांना आणि ३० वर्षाखालील तरूणांनाही कोरोनाची लागण होत असल्याने राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या त्रिसुत्रीचे पालन करणे हा एकमेव उपाय असल्याचे दिसून येत आहे.
वैद्यकिय शिक्षण विभागाने तयार केलेला वयोमानानुसारचा तक्ता खालीलप्रमाणे