राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी आभार मानले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजे, त्यांनी आम्हाला तुतारी हे चिन्ह दिले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार फुंकणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदना दिली, त्यांच्यासमोर नतमस्तक झालो. आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलूखामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईची सुरुवात तुतारी विरोधकांना आव्हान देऊन असायची त्याचबरोबर प्रत्येक विजयाची त्यांच्या विजयी होऊन जावी त्यांचं राजधानीत पुनरागमन व्हायचं त्यावेळी देखील त्यांची तुतारीनेच स्वागत व्हायचं हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्म धर्म संयोगाने आपण निवडणूक आयोगाला जी चिन्ह दिली ती पहिली तिन्ही चिन्ह निवडणूक आयोगाने काही कारणास्तव नाकारली आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पुन्हा विचार करून तुतारी हे चिन्ह एकमतानं निवडणूक आयोगाकडे पाठवले जे निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली याबद्दल आनंद झालेला आहे. याबद्दल सर्व तमाम मराठी मुलूखाला आनंद झाला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासुन परंपरा सांगणारे आमचे तुतारी वाजवणारा पुरुषांत असणारा माणूस हा आज पवार साहेबांचे चिन्ह होणार आहे. या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या निवडणुका जाता हे चिन्ह भविष्यकाळात वापरले जाईल असा आम्हाला विश्वास आहे. त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या या चिन्हाच अनावरण आज रायगड किल्ल्यावरून करण्यात येत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
सेवा सन्मान आणि स्वाभिमान- खासदार सुप्रिया सुळे
सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतक-यांचा-महिलांचा-ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी किल्ले रायगडावर पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या अनावर प्रसंगी म्हटले आहे.
तुतारी स्वाभिमानाचं प्रतिक, शिवभक्तांसाठी दुग्ध-शर्करा योग- खासदार अमोल कोल्हे
महाराष्ट्राच्या काळजातील तुतारी आता राज्याची स्वाभिमानाची ललकारी होईल. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राहण्यासाठी प्रयत्नशील राहील असे खासदार अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
सेना जेव्हा युद्धाला निघत असते, त्यावेळेस वाजवलं जाणार वाद्य म्हणजे तुतारी आहे, आणि आपण जिंकल्यानंतर युद्धावरून जेव्हा परत येतो तेव्हादेखील तुतारीचं वाजवली जात असते. निवडणुकीच्या युद्धात उतरत असताना ८४ वर्षाच्या आमच्या योद्धाला तुतारी हातात देऊन शुभ संकेत निवडणूक आयोगाने दिल्याचा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला आहे.