Breaking News

सुषमा अंधारे म्हणाल्या,…ते सांगतात पण तशी आयोगात नोंदच नाही

शिवसेनेसह निवडणूक चिन्हावर दावा करणारी याचिका एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. त्या याचिकेला उध्दव ठाकरे गटाकडून काल सविस्तर कागदपत्रे सादर करत प्रत्युत्तर दिले. त्यावर निवडणूक आयोगाने शिवसेनेत फूट पडल्याचे अधोरेखित करत मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीत शिंदे गट आणि ठाकरे गटाला शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्य बाण वापरता येणार नसल्याचा अंतरिम आदेश दिला. त्यामुळे या पोटनिवडणूकीत या दोन्ही गटांना शिवसेना आणि धनुष्यबाण वापरता येणार नाही. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना एकनाथ शिंदे गटावर टीका केली.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आता मला कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही. आम्ही कागदपत्रांची पूर्तता केली. तरी आयोगाचं म्हणणं आहे की त्यांचे जास्त फॉर्म आले. मुळात एकनाथ शिंदे स्वत:कडे मुख्य नेता पद आहे असं सांगतात. पण शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे नोंद केलेल्या संहितेमध्ये मुख्य नेता असं कोणतं पदच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत पक्ष म्हणून निर्णय घ्यायचे अधिकार पक्षाच्या कार्यकारी प्रमुखांना आहेत. त्यामुळे ते अधिकार सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. मग एकनाथ शिंदे गट कोण आहे? ते कसा हा निर्णय घेऊ शकतात? पण जिसकी लाठी उसकी भैंस असते. सत्तेचा गैरवापर ते करत राहतील, पण लोक उफाळून येतील, असा इशाराही दिला.

राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे असे अनेक लोक आजपर्यंत शिवसेनेतून बाहेर पडले. पण शिवसेनेच्या मुळावर उठणं, शिवसेनेला संपवणं हे काम आजपर्यंत कुणीच केलं नाही. हे वाईट आहे. मात्र निवडणूक आयोगाचा असा निर्णय येऊ शकतो, यासाठी आम्ही आम्ही मानसिकदृष्ट्या तयारच होतो.  मुळात आम्ही सगळे मानसिक दृष्ट्या तयारच होतो की हे लोक असं कुटिल राजकारण करतील. हे लोक पाताळयंत्री आहेत आणि इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेना प्रमुख आणि नेत्यांची यावर बऱ्यापैकी चर्चा झाली. ते चिन्ह नेमकं काय असावं, नाव काय असावं याबाबत दुपारच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळे तसं पाहाता फारसा प्रश्न निर्माण होणार नाही, मला वाटतं चिन्ह, नाव यामुळे एवढी काही अडचण निर्माण होणार नाही. चिन्हासोबत आमचा भावनिक ऋणानुबंध आहे. पण राष्ट्रवादी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडली, त्यांना घड्याळ चिन्ह मिळालं तेव्हा ते रातोरात लोकांपर्यंत पोहोचलं होतं. वंचित आघाडीला कपबशी मिळाली, तेव्हा ती रातोरात लोकांपर्यंत पोहोचली होती. आता तर काळ अजून पुढे गेला आहे. आपण 5G च्या युगात आहोत. या काळात चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक हायटेक माध्यमं आहेत. उलट आत्ता शिवसैनिक अधिक त्वेषाने ते काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या ६ व्या टप्प्यात ५९ टक्के मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी आज ५८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेतले.  लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Marathi e-Batmya

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading