लोकसभा निवडणूकीचा सहावा टप्पा नुकताच पार पडला. या सहाव्या टप्प्यात देशातील राजकिय कल बदलल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या लेखात भाजपामधील अंतर्गत राजकारणावर भाष्य करत लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडूण येऊ नये यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचाही आरोप केला. त्यामुळे आज सकाळपासून भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. त्यातच काँग्रेसचे नागपूरमधील उमेदवार विकास ठाकरे यांनीही संजय राऊत यांना शहाजोगपणाचा सल्ला दिला.
संजय राऊत यांनी लेखात भाजपावर आरोप करताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुढील पंतप्रधान असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच राज्याच्या राजकिय वर्तुळात आहे. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणूकीत पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताकद लावल्याचा आरोप केला.
तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील उमेदवार निवडणूकीत यावा याकरिता मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला असल्याचा आरोप करत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडूण येऊ नये यासाठीही मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केल्याचा आरोप केला. त्यामुळे महायुतीतील पक्षांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत एकच टीका सुरु केली.
विरोधकांकडून टीका होत असतानाच नागपूर लोकसभा मतदारसंघातील नितीन गडकरी यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका करत म्हणाले की, संजय राऊत यांना मी सांगण्याएवढा मोठा नेता नाही. परंतु आपण कोणत्या पक्षाच्या आघाडीत आहोत याचे किमान त्यांनी लक्षात ठेवावे. तसेच नितीन गडकरी यांच्याबद्दल त्यांना इतकेच प्रेम असेल तर त्यांनी नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन आपले प्रेम उतू घालवावे पण आपल्या प्रेमावर असे जाहिरपणे लिहू नये असा खोचक सल्लाही दिला.