मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री राहीलेले छगन भुजबळ हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील आरोपावर निर्णय कधी होईल तेव्हा होईल. सध्या भुजबळ हे आजारी असून त्यांच्या शरीरातील हेमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच त्यांना इतर काही त्रासही होत आहे. मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी राहीलेल्या व्यक्तीला सार्वजनिक रूग्णालयात दाखल करण्यात येते. तसेच त्यांना कराव्या लागणाऱ्या विविध चाचण्यांसाठी स्वत:लाच अर्ज भरून द्यावा लागतो ही बाब अतिशय दुर्दैवी असून किमान माणुसूकीच्या दृष्टीकोनातून सहज सोप्या पध्दतीने उपचार मिळण्यासाठी राज्य सरकारकडून मदत झाली तर बरे होईल अशी मागणी औचित्याच्या मुद्याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी केली.
या मागणीची तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत राज्य सरकारकडून तुरुंगात असलेल्या व्यक्तीच्या बाबत कोणताही हस्तक्षेप करत नाही. मात्र ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहीलेले असल्याने त्यांच्यावर आवश्यक ते असलेले सर्व उपचार व्हावेत यासाठी तुरुंग प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले.