मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. आता तर राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराची संख्याही पार केली. त्यातच राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरु होणार असल्याची घोषणा यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्याअनुषंगाने एकाबाजूला शाळा सुरु होण्याची तारीख जवळ येत असतानाच दुसऱ्याबाजूला कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरु होणार की नाही याबाबत संभ्रम सुरु झाल असतानाच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शाळा बंद करणे चुकीचे असून प्रत्येक वेळी शाळा बंद ठेवणे योग्य होणार नाही.
सध्या कोरोना वाढत आहे त्यामुळे आम्हाला निश्चितच काही निर्णय घ्यावे लागतील. सध्या शाळा सुरु करणे गरजेचं आहे. या महिन्याच्या १५ तारखेला शाळा सुरु होतील. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता शाळा सुरु ठेवणे अवश्यक आहे. शाळा, शिक्षक, वही असं वातावरण असणं आवश्यक आहे. मागील दोन वर्षांमध्ये दुसरीची मुलं शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करु असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शाळा सुरु करण्यापूर्वी टास्क फोर्सशी आम्ही चर्चा करू आणि नंतरच एसओपी जाहीर करु. सध्या सर्व मुलांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. सध्या राज्य आणि केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक नियम वेगळे आहेत. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करुनच एसओपी जारी केली जाईल. त्यानंतर याबाबत योग्य ते धोरण जाहिर करू असेही त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर सध्या राज्यात मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याबाबतही निर्णय होणार आहे. तरीही मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेवून धोरण जाहिर करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशासह राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपार्यंत अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. पुणे, मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्येही पुन्हा कोरोनाचा प्रसार होत आहे.