मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्लाबोल करत आंदोलन केले. या आंदोलनाचा कट एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या इशाऱ्यावर झाल्याच्या संशयातून त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर अटक केली. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर सातारा येथे दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कोल्हापूर, अकोला येथे सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सोलापूरातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच सदावर्ते यांना सोलापूर पोलिसांकडूनही ताब्यात घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वकील गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात कलम १५३अ, ब, ५००, ५०६, ५०६, ५०७ कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
तर सध्या कोल्हापूर पोलिसांना वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात आलेला आहे. कोल्हापूर शाहुपुरीत गुन्हा दाखल झाला असून, कोल्हापूर पोलीस आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्याप्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आलेली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
मात्र सदावर्ते यांच्या विरोधात सातत्याने महाराष्ट्रातील विविध भागात गुन्हे दाखल होत असल्याने त्यांना गुन्हे महाराष्ट्र दौरा सुरु असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. तसेच सध्या न्यायालयाकडूनही त्यांना पोलिस कोठडी देण्याऐवजी सदावर्ते यांना ठिकठिकाणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येत आहे. त्यामुळे सदावर्तेंचा मुक्काम एका न्यायालयीन कोठडीतून दुसऱ्या जिल्ह्याच्या कोठडीत असा गुन्हे प्रवास सध्या सुरु झाला आहे.
Tags adv gunratna sadawarte maratha reservation ncp suprimo sharad pawar st workers strike
Check Also
नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही
लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …