Breaking News

आणि अजित पवारांनी सांगितला भाजपा नेत्यांना वाईन आणि दारूतला फरक मद्यराष्ट्र टीकेवरून अजित पवारांनी साधला निशाणा

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात सुपर मार्केटसह एक हजार चौरस फुटाच्या दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीकेची झोड उठवित मद्यराष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका केली. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने घेत फडणवीसांना दारू अर्थात मद्य आणि वाईनमधला फरक सांगत त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावत त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार म्हणाले की, या मुद्द्यावर सगळ्यांचा गैरसमज करण्यात आल्याचं दिसून येत आहे. वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होत असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समजावून सांगत अशी अनेक फळांचा वापरही करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट करत आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे.

शेवटी आम्ही सरकारमध्ये काम करत असताना जनतेचं नुकसान होईल वगैरे असं काही करणार नाही. सुविधा देणं वेगळं. मध्य प्रदेशनं घरपोच दारू पोहोचवण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांचं त्यांना लखलाभ. आपण निर्णय घेताना त्यात दारू नाही, तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण काही लोकांनी व्हिडीओ क्लिप वगैरे काढून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न, सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

वाईन विक्री परवानगीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करताना राज्यातील भाजपा देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागल्याचा टोला लगावत वाईन आणि दारू यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहिती आहे. तरीही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला वाईन चढली आहे व ते सरकारच्या विरोधात बोंब मारीत आहेत अशी खोचक टीका केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *