मराठी ई-बातम्या टीम
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मणक्यावरील शस्त्रक्रियेनंतर मागील काही महिन्यापासून मुख्यमंत्री हे सक्रिय नव्हते. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत होती. तसेच मुख्यमंत्री पदाची सुत्रे एकतर उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे अन्यथा मुलगा तथा मंत्री आदित्य ठाकरे किंवा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवावी अशी खोचक मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आज ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित सरकारी कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रत्यक्ष हजेरी लावत विरोधकांच्या टीकेला अप्रत्यक्ष उत्तर दिले.
कोरोना परिस्थिती आणि शस्त्रक्रियेनंतर घ्यायची काळजी यामुळे मुख्यमंत्री राज्याच्या अधिवेशनालाही उपस्थित राहू शकले नाहीत. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचा भडिमार केला होता. अजूनही त्यांच्यावर टीका करणं सुरूच आहे. मात्र आज तब्बल दोन महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावरूनच आता मुख्यमंत्री Back in Action आहेत असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितलं होते की त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र या कोविडमध्ये आम्ही सगळेच जरा जास्त काळजी घेत होतो. आता ते बाहेर पडले आहेत. Back in Action मध्ये असून आतापर्यंत ऑनलाइन होते, आता सगळीकडे दिसतील.
यापूर्वीही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री लवकरच कमबॅक करतील असेही वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांकडून होणाऱ्या टीकेबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले होते, मुख्यमंत्री कधीही मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. पण आम्हीच ओमायक्रॉनमुळे काळजी घेत आहोत. विरोधी पक्ष जे काही गलिच्छ राजकारण करत आहेत त्यावर फार काही बोलायचं नाही. ते कितीही खालच्या स्तराला जाऊ शकतात. आम्ही काही त्यांच्या तोंडी लागणार नाही.