अहमदनगर : प्रतिनिधी
केंद्रात रस्ते महामार्ग विभागाचा मंत्री झाल्यापासून माझ्याकडे अनेकजण रस्त्याची कामे घेवून येत आहेत. कधी विमानाने, तर कधी रेल्वेने तर मी महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक जण मला या गावाला जोडणारा रस्ता करून द्या, माझ्या मतदारसंघातून जाणारा महामार्ग द्या अशी असंख्य आमदार, खासदार भेटून माझ्याकडे कामे आणून देत असतात. मात्र यातील सर्वाधिक प्रमाण हे राज्यातील आमदार-खासदारांचे असल्याने मला महाराष्ट्रातला रस्ते बांधणारा मंत्री झाल्यासारखं वाटतंय असा मिश्किल किस्सा केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला.
अहमदनगर येथील रस्ते महमार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगितला. परंतु महाराष्ट्रातील सर्वपक्षिय आमदार खासदार रस्त्याच्या कामासाठी नितीन गडकरी यांना भेटत असल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण रस्त्याची कामे करत नसल्याचे तर गडकरी यांना सूचवायचे नाही का? असा प्रश्न राज्याच्या राजकारणात उपस्थितीत करण्यात येत आहे.
माझ्याकडे राज्यातील छोटे-मोठे रस्ते करण्यासाठी फारसा निधी नाही. मध्यंतरी माझ्याकडे १२०० कोटी रूपये होते. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांसाठी २०० कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी २०० कोटी आणि काँग्रेसच्या आमदारांसाठी २०० कोटी रूपयांचा निधी होता. तर विरोधी पक्ष म्हणून भाजपा आमदारांना ६०० कोटी रूपये वाटप केल्याचे सांगितले.
माझ्याकडून खरे तर रस्त्याची कामे करून घेण्यासाठी अनेक जण येत असतात. परंतु छोट्या रस्त्यांची कामे माझ्याकडे आणू नका असे आवाहन करत माझ्याकडे मोठ्या रस्त्यांचे प्रकल्प आणा, त्यासाठी माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर निधी आहे. मोठे प्रकल्प आणले तर मला जास्तीचा निधी देता येवू शकेल असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरला सर्वाधिक निधी मिळाल्याचे सांगितले. परंतु मी ज्या ही ठिकाणी जातो त्या ठिकाणीचा प्रत्येक आमदार-खासदार आणि त्या राज्याचा मुख्यमंत्रीही असेच बोलत असतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मी जरी केंद्रात असलो तरी मी तेथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे महाराष्ट्र १ नंबरवर असावा म्हणून मला नेहमी वाटते. त्याच भावनेतून मी राज्यातील महामार्गाचे जाळे चांगले व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत या महाराष्ट्रामुळेच मी असल्याचेही त्यांनी सांगितले.